नवी दिल्ली – भारतात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज लाखोच्या संख्येने रुग्ण वाढत असून आरोग्य सुविधा कमी पडत आहेत. सध्या देशात करोना चाचण्याचं प्रमाण वाढल आहे. मात्र या चाचण्यांवर परदेशातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
भारतातून ऑस्ट्रेलियात परतणाऱ्या प्रवाशांची भारतात होणारी करोना चाचणी विश्वासार्ह किंवा अचूक नाही. याचा परिणाम ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थेवर होत असून नव्या समस्या निर्माण होत असल्याचं वेस्ट ऑस्ट्रेलिया स्टेट प्रीमियर मार्क मॅकगोवन यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली.
मार्क मॅकगोवन ट्विट करून म्हणाले की, मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो की, मागील २४ तासात करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र आज चार नवे कोविड-१९ रुग्ण आढळले आहेत. ते सर्व भारतातून परतले असून सध्या एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत.
I can confirm that no new local cases of COVID-19 were detected in the past 24 hours – another great result.
Today, four cases of COVID-19 have been reported, these are all related to returned travellers from India and they are all in hotel quarantine. pic.twitter.com/UxfcJv9ciB
— Mark McGowan (@MarkMcGowanMP) April 27, 2021
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मॅकगोवन म्हणाले की, आज सकाळी भारतातून एक विमान ऑस्ट्रेलियात दाखल झालं आहे. यात ७८ प्रवाशी भारतातून आले आहेत. आमचा अंदाज आहे की, या प्रवाशांमध्ये अनेक जणांची करोना चाचणी पॉझिटीव्ह येऊ शकते. मुळात भारतात केल्या जात असलेल्या करोना चाचण्या एकतर योग्य नाहीत, किंवा त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियात अडचणी निर्माण होऊ शकतात, असंही त्यांनी नमूद केलं.