नवी दिल्ली – करोना साथीच्या विरोधातील सरकारच्या लढ्यात आपला सहभाग देताना भारतीय रेल्वेने अडीच हजार बोगींचे विलगीकरण कक्षात रुपांतर केले आहे. अशा स्वरूपाच्या पाच हजार बोगींचे विलगीकरण कक्षात पहिल्या टप्प्यात रुपांतर करण्यात येणार आहेत. अडीच हजार बोगींच्या कक्षात 40 हजार विलगीकरण खाटा असतील. त्या आता वापरासाठी तयार आहेत, अशी माहिती रेल्वेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आली.
सध्या भारतात कोरोनाचे चार हजारपेक्षा अधिक बाधित आहेत. तर 109 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 292 जण कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यापासून मुक्त झाले आहेत. “”त्याच्या आराखड्याला मंजूरी मिळाल्यानंतर विभागीय रेल्वे तर्फे बोगींमध्ये बदलाची कारावाई तातडीने सुरू झाली. दररोज 375 बोगींचे विलगीकरण कक्षात रुपांतरण करण्यात आले. देशातील 133 ठिकाणी हे काम सुरु होते”, असे रेल्वेच्या निवेदनात म्हटले आहे.
वैद्यकीय मार्गदर्शक सुचनांनुसार या बोगींना सुसज्ज बनवण्यात आले आहे. तेथील वास्तव्य अधिक सुखकर होण्यासाठी आणि वैद्यकीय देखरेख सुलभतेने होण्यासाठी गरजेप्रमाणे आणि त्याच्या निकषांप्रमाणे प्रमाणे बदल करण्यात आले आहेत. भारत सरकार आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना विरोधातील लढ्यात सहकार्य करण्याच्या हेतूने ही कार्यवाही करण्यात आल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
भारतातील राज्यानुरूप कोरोनाबाधित आणि कंसात बळींची संख्या
आंध्र प्रदेश 226 (1), अंदमान निकोबार 10 (10), अरूणाचल प्रदेश 1(0), आसाम 26 (0), बिहार 30 (0), चंदीगढ 18 (0), छत्तीसगढ 9 (3), दिल्ली 503 (18), गोवा 7 (0), गुजरात 122 (18), हरीयाणा 84 (25), हिमाचल प्रदेश 13 (1), जम्मू काश्मिर 106 (4), झारखंड 3 (0), कर्नाटक 151 (12), केरळ 314 (55), लडाख 14 (10), मध्य प्रदेश 165 (0), महाराष्ट्र 690 (42), मणीपूर 2 (0), ओडिशा 21 (2), पुदुचेरी 5 (1), पंजाब 68 (4), राजस्थान 253 (21), तामिळनाडू 571 (8), तेलंगणा 321 (34), उत्तराखंड 26 (4), उत्तर प्रदेश 227 (19), प. बंगाल 80 (10)