नवी दिल्ली – जर प्रत्येकाने करोना सुसंगत वर्तणूक ठेवली आणि आपापली जबाबदारी पार पडली तर करोनाचा देशात पॉझिटिव्हिटी दर येत्या तीन आठवड्यात पाच टक्क्यांच्या खाली येईल, असा विश्वास ऑल इंडिया मेडिकल सायन्सच्या (एम्स) तज्ज्ञ डॉक्टरांनी रविवारी व्यक्त केला.
देशातील कोविडच्या स्थितीबाबत एम्सचे डॉक्टर एन. वीग म्हणाले, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटीचा दर तपासला पाहिजे. तो एक ते पाच टक्क्यांपर्यंत खाली ठेवण्याचे उद्दीष्ठ असले पाहीजे. मुंबईत आधी पॉझिटिव्हिटी दर 26 टक्क्यांपर्यंत वाढला होता. मात्र कठोर निर्बंधांनंतर तो 14 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. दिल्लीत पॉझिटिव्हिटी दर 30 टक्के आहे. तेथे कठोर निर्बंधांची आवश्यकता आहे.
या परिसंवादात सहभागी होताना एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, रेमडेसिविर ही काही जादूची कांडी नाही. ज्या बाधितांना याची तीव्र लक्षणे आहेत आणि ऑक्सिजन पातळी 93 च्या खाली आहे, अशांसाठीच ते इंजेक्शन वापरावे. त्याचा आणि ऑक्सिजनचा गैरवापर टाळला पाहीजे. बहुसंख्य बाधित घरीच बरे होत आहोत.
डॉ. विग म्हणाले, आपण आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना वाचवले पाहीजे. ते मोठ्या संख्येने बाधीत होत आहेत. जर ते वाचले तर बाधित वाचतील. हे दोन्ही वाचले तर अर्थव्यवस्था वाचेल. आपले मुख्य उद्देश करोनाची साखळी तोडणे हाच असला असला पाहिजे. त्याद्वारे आपण बाधितांची संख्या खाली आणायला हवी.