नवी दिल्ली – देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने ३३ लाखांचा टप्पा ओलांडला असून ६० हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच आज दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्रीय गृह मंत्रालयावर गंभीर आरोप केला आहे.
याबाबत त्यांनी गृह सचिव अजय भल्ला यांना एक पत्र लिहिलं असून यामध्ये “कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव” असल्याचा आरोप केला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व्यापक चाचण्या करायला हव्यात असं जगभरातील तज्ज्ञ सांगत असतानाच जैन यांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
काय आहेत जाईन यांचे आरोप?
पत्राद्वारे जाईन यांनी केंद्रीय गृह मंत्रालयावर गंभीर आरोप लावले असून ते म्हणतात,
“दिल्लीमध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढत आहे. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. मी हे पत्र माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिणार होतो. मात्र त्यांची तब्येत बरी नसल्याने आणि ते एम्समध्ये दाखल असल्यानं मी हे पत्र तुम्हाला लिहितोय. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत प्रत्येक दिवशी होणाऱ्या 20,000 चाचण्या वाढवून 40 हजारांपर्यंत नेण्याचा आदेश दिला आहे”
“काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गृह मंत्रालयाकडून दिल्लीच्या अधिकाऱ्यांवर दिल्लीत चाचणी आणखी वाढवल्या जाऊ नयेत यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. सरकार आपल्या जनतेसाठी निर्णय घेण्यात सक्षम आहे. असं असतानाही दिल्लीत करोना चाचण्या करण्यासाठी अरविंद केजरीवाल सरकारला का रोखलं जातंय?, तुम्हाला विनंती करतो की अशा पद्धतीचा दबाव टाकला जाऊ नये”