नवी दिल्ली – चीनमधून जगभरात पसरलेल्या करोना विषाणूंचा फटका क्रिकेटसह सर्व जागतिक क्रीडाक्षेत्रालाही बसला आहे. या विषाणूंचा प्रसार तसूभरही कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने जपानमधील ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याची तसेच रद्ददेखील करण्याची मागणी पुढे येत आहे.
इतकेच नव्हे तर भारतात होणारी इंडियन प्रीमिअर लीगही (आयपीएल) रद्द करा, अशी मागणी विविध राज्यांच्या सरकारकडून केंद्र सरकारकडे होत आहे. सरकारनेही याची दखल घेत देशात या महिन्यात होणाऱ्या सर्व क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांशिवायच खेळवा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या कित्येक स्पर्धा एकतर नव्या वेळापत्रकानुसार काही महिन्यांनी होतील तर काही स्पर्धां रद्दच करण्यात आल्या आहेत. व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, नेमबाजी, मोटर स्पोर्टस, बांगलादेशात होणारी आशियाई इलेव्हन तसेच रोड सेफ्टी तर भारतात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी रणजी करंडक स्पर्धादेखील करोनाच्या सावटाखाली आली आहे.
यातील काही स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून रणजी करंडक स्पर्धेच्या शुक्रवारी होणाऱ्या अंतिम लढतीच्या अखेरच्या दिवसाच्या खेळाला प्रेक्षकांना मैदानात प्रवेश नाकारण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन सामने प्रेक्षकांविनाच खेळविण्यात येणार आहेत.
तसेच येत्या 29 मार्चपासून सुरू होत असलेली आयपीएल स्पर्धादेखील प्रेक्षकांविनाच खेळविली जाणार आहे. सध्या तरी करोनावर निश्चित उपचार उपलब्ध झालेला नसल्याने व चीनसह जवळपास 100 देशांमध्ये या विषाणूचे रुग्ण आढळल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या करोना विषाणूला महामारी घोषित केले आहे.