मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनात अर्थसंकल्पाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. दरम्यान, पूर्णत: दिशाभूल करणारे आणि तोंडाला पाने पुसणारे उत्तर अर्थमंत्र्यांनी दिल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कापूस खरेदी करून उपकार करतोय्, अशा शैलीत त्यांनी उत्तरं दिली आहेत. नियमित स्वरूपात होणारी कामे सांगून त्यालाच विकास सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा जाहीर सभेतील भाषणाचाच प्रयत्न केला गेला. सिंचन प्रकल्पांबाबत कोणताही उल्लेख नाही. अर्थसंकल्पात आर्थिक मापदंडांची चर्चा करायची असते, त्याचाही उल्लेख नाही. मराठवाडा वॉटर ग्रीडबाबत मोघम उत्तर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण यांना काहीही मिळालेले नाही. उपमुख्यमंत्र्यांनी केवळ मोघम उत्तरे आणि राजकीय टोलेबाजी केली.
शेतकरी, बेरोजगार, महिला सर्वच घटक उपेक्षित राहिले आणि म्हणून आम्ही विधानसभेत सभात्याग केला. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव औरंगाबाद विमानतळाला दिले, त्याचे आम्ही स्वागतच करतो. पण, आमच्या सरकारने ज्या नव्या विमानतळासाठी पुढाकार घेतला, त्याचा उल्लेख या अर्थसंकल्पात का नाही, याचेही उत्तर जयंतराव पाटील यांनी द्यावे!, असे फडणवीस म्हणाले.