कॉंग्रेस कार्यकारिणीच्या ठरावातील मागणी
नवी दिल्ली, दि. 10 – कॉंग्रेस कार्यकारिणीच्या आज झालेल्या सभेत देशातील कोविड स्थितीच्या बेफिकीरीच्या हाताळणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. मोदी यांनी या काळात ज्या चुका केल्या आहेत त्याबद्दल त्यांनी प्रायश्चीत्त घेतले पाहिजे अशी मागणीही या संबंधात संमत करण्यात आलेल्या ठरावात करण्यात आली आहे. आपला व्यक्तिगत अजेंड राबवण्याऐवजी मोदींनी लोकांची सेवा केली पाहिजे, मोदींच्याच चुकांमुळे जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असेही कॉंग्रेसने म्हटले आहे.
करोनाच्या संबंधातील आकडेवारीवरही कॉंग्रेसने सवाल उपस्थित केला असून देशातील कोविड रुग्णांची संख्या, मृतांची संख्या याच्या सरकारी आकडेवारीवरही कॉंग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
वस्तुस्थितीचा सामना केला तरच त्यातून उत्तर मिळू शकेल, सत्य लपवून काहीही होणार नाही असेही त्यांनी सरकारला उद्देशून म्हटले आहे. लसीकरणाच्या संबंधातील सरकारच्या धोरणावरही कॉंग्रेसने चिंता व्यक्त केली आहे. या अडचणीच्या घडीला सर्व देशाने एकसंधपणे सामोरे गेले पाहिजे असे आवाहनही कॉंग्रेसने केले आहे. कोविड काळातील मोदी सरकारची असंवेदनशीलता ही देशातील जनतेचा अवमान करणारी आहे, अशी टिप्पणीही कॉंग्रेसने केली आहे.
पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळू शकलेले नाही त्याचे परिक्षण करण्यासाठी 48 तासांच्या आत समिती नेमण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. या निवडणुकीत कॉंग्रेसची कामगीरी निराशाजनक होती, असे मत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकारणीत बोलताना व्यक्त केले.