पुण्यात 10 बालकांवर उपचार : मुंबईतही आढळले रुग्ण
– सागर येवले
पुणे – करोनाला पराभूत करून बरे होणाऱ्या लहान मुलांना पेडियट्रिक मल्टिसिस्टिम इन्फ्लमेटरी सिन्ड्रोम (पिम्स) च्या व्याधींना सामोरे जावे लागत आहे. पुण्यात अशा जवळपास 10 बालकांवर आतापर्यंत उपचार सुरू आहेत.
“करोना होऊन गेल्यानंतर तीन ते चार आठवड्यानंतर “पीम्स’ची लक्षणे दिसू लागतात. त्यावर वेळीच उपचार झाल्यास हा रुग्ण ठणठणीत होऊ शकतो. मात्र, त्यास विलंब झाल्यास तो प्राणघातकही ठरू शकतो,’ असे वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, काही बालकांना करोना होऊन जातो. त्याची लक्षणे दिसत नसल्यामुळे करोना झाल्याचे समजत नाही. त्यांच्यात अँटिबॉडिज तयार होतात. या अँटिबॉडिज काही वेळेस शरीरावर प्रतिकूल परिणाम करण्यास सुरुवात करतात.
‘पीम्स’ या आजारात खूप जास्त ताप येणे, शरीरावर रॅश उठणे, हाता-पायांना सूज येणे, खाज सुटणे, जुलाब होणे, खूप पोट दुखणे अशी प्राथमिक लक्षणे आढळतात. त्यावर वेळीच उपचार न केल्यास या ऍन्टिबॉडिज हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांवर हल्ला करतात. त्यामुळे बाधिताला वेळप्रसंगी व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ येते, असे डॉक्टरांनी सांगितले. मुंबईमध्ये वाडिया बालरोग रुग्णालयात या आजाराचे 18 रुग्ण गेल्या महिन्यात दाखल होते. त्यातील एका मुलाचा मृत्यू झाला होता, तर एक मुलगा बारा दिवस व्हेंटिलेटरवर होता. असेही रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
8 ते 12 वर्षाच्या मुलांना धोका अधिक
“पीम्स’ या आजाराचा धोका 8 ते 12 या वयोगटातील मुलांना होत असल्याचे आतापर्यंत तपासलेल्या रुग्णांमधून समजते. त्यामध्ये अगदी लहान अथवा मोठ्या मुलांना या आजाराची लक्षणे दिसू शकतात. पुण्यातील खासगी रुग्णालयात अशा सात लहानग्यांना बरे केले आहे.
कावासाकीची लक्षणे
करोनावर मात करून बरे झालेल्या लहान मुलांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह येतो. मात्र, कोविड ऍन्टिबॉडीजची टेस्ट पॉझिटिव्ह येते. यामुळे हा संसर्ग पसरवत नसला, तरी साधारण तीन ते चार आठवड्यानंतर यातील काही मुलांमध्ये “कावासाकी’सारख्या आजाराची लक्षणे दिसतात. रक्तवाहिन्याविरोधात ऍन्टिबॉडीज तयार होत असल्याने अचानक रक्तदाब कमी होणे आणि त्यानंतर “कावासाकी’सारखे आजार होत असल्याचे दिसून येते, अशी माहिती लहान मुलांचे अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. सागर लाड यांनी दिली.
‘पिम्स’ आजाराचे अमेरिकेत 28 रुग्ण सापडले आहेत. त्याठिकाणी संशोधन सुरू असून, आता भारतातही चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि आता पुण्यात या आजाराचे रुग्ण सापडले आहेत. त्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळे आजाराची लक्षणे दिसल्यास पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. सागर लाड, लहान मुलांचे अतिदक्षता विभाग तज्ज्ञ