बंदसदृश स्थितीमुळे जनजीवन प्रभावित होण्याची चिन्हे
नवी दिल्ली: करोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. त्यातून अनेक राज्यांनी एकप्रकारे करोनाकर्फ्यू जाहीर केला आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या बंदसदृश स्थितीने जनजीवन प्रभावित होण्याची चिन्हे आहेत.
देशातील करोनाबाधितांची संख्या 81 वर पोहचली आहे. ते बाधित 11 राज्यांमधील आहेत. कर्नाटकमधील वृद्धाच्या मृत्युमुळे देशात करोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली. त्यापार्श्वभूमीवर, अनेक राज्यांनी करोनाशी लढा देण्याच्या उद्देशातून विविध पाऊले उचलली आहेत.
शाळा, महाविद्यालयांबरोबरच विविध प्रकारची सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय अनेक राज्यांनी घेतला. त्यामध्ये महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, उत्तरप्रदेश, दिल्ली, बिहार, मध्यप्रदेश, छत्तिसगढ, पंजाब, ओडिशा, जम्मू-काश्मीरचा समावेश आहे. करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 42 हजार जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यातील अनेकांना त्यांच्या घरांमध्येच उपचार पुरवले जात आहेत.