कूच बिहार – पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दरम्यान 10 एप्रिल रोजी सुरक्षा दलाच्या गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज भेट घेतली. या घटनेतील दोषी कोणीही असले तरी त्यांना शिक्षा केली जाईल असे ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले.
कूच बिहार मध्ये या पाच जणांचे पुतळे निवडणुकीनंतर उभारले जातील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी शब्द देत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. कूचबिहार च्या हिंसाचारात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना सर्व मदत केली जाईल मारेकऱ्यांना शिक्षा केली जाईल असे आश्वासनही ममता बॅनर्जी यांनी दिले. मरण पावलेल्या यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले.
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दरम्यान येथील सीतालकुच येथे हिंसाचार झाला होता. सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात चार जण ठार झाले होते. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकीय नेत्याला कूच बिहार जिल्ह्यामध्ये आगामी 72 तास प्रवेश दिला जाऊ नये असे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र ही मुदत संपल्यावर आपण कूच बिहार येथील मृतांच्या नातेवाईकांना भेटणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले होते. पश्चिम बंगाल मधल्या पाचव्या टप्प्यासाठी 17 एप्रिलला मतदान होणार आहे.