वाघोलीतील समस्येबाबत प्रशासनही अलर्ट
आतापर्यंत तीनवेळा हातोडा कारवाई
दत्तात्रय गायकवाड
वाघोली – येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भेट देऊन नुकतीच वाघोलीतील वाहतूक कोंडी तातडीने सुरळीत करण्याबाबतच्या उपाययोजनाबाबतची माहिती घेऊन पाहणी केली. सरपंच वसुंधरा उबाळे, सर्व सदस्यांच्या साथीने वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढली आहेत. ही अतिक्रमणे ग्रामपंचायतीने आतापर्यंत तिसऱ्यांदा काढली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सातत्य हवे, असा सूर सर्वसामान्यांतून उमटत आहेत.
ग्रामपंचायतीकडून खबरदारी घेऊन वाहतूक कोंडी तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, वाघोलीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीच्या उपाययोजनेला काही कालावधी लागत आहे. त्यामुळे वाघोलीतील वाहतूक कोंडी नागरिकांच्या दृष्टीने थोडी वेळखाऊ झाली आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, तत्कालीन पोलीस निरीक्षक डी. एस. हाके व सध्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी वाघोलीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजनांबाबत ग्रामस्थ व प्रशासनाशी समन्वय साधून हा प्रश्न काहीअंशी सोडविला आहे. ग्रामस्थांची मदत व पोलिसांचे मनुष्यबळ वापरून ही वाहतूक कोंडी कमी केली आहे. मात्र, सध्या उपलब्ध जागा आणि त्या जागेमध्ये वाहतूक कोंडीची ठिकाणे आणि तातडीने दुरुस्त करण्याबाबत योग्य खबरदारीच्या पर्यायांवर कार्यवाही करण्यात येत आहे.
पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उपाययोजनांवर तातडीने दखल घेण्याबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. परंतु काही ठराविक विभाग काम करत असल्याचे व काही विभाग काम करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींवर कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीबाबत वाढता ताण सहन करावा लागत आहे. नागरिकांना वाघोलीतील वाहतूक काही दिवसांची दिलासा देणारी तर काही क्षणांला गर्दीत वाट पाहणारी अशाप्रकारचा अनुभव मिळत आहे.
वाहतूक कोंडीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे तातडीने काढण्याबाबत, वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत मनुष्यबळाबाबत प्रशासनाने खबरदारी गरजेची झाली आहे. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट, माजी आमदार बाबूराव पाचर्णे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, आजी- माजी ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आदींच्या पाठबळामुळे वाघोलीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी यापूर्वी मोलाची कामगिरी झाली होती.
वाघोलीमध्ये सुरू असलेल्या कामाच्या गतीचा आलेख तातडीने वाढला पाहिजे. कामे त्वरित पूर्णत्वास आल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
– राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच, वाघोली.
तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या मदतीने वाघोलीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी यापूर्वी मोलाची कामगिरी झाली आहे. याच कामाचा आलेख वाढविण्यात यावा.
– रामभाऊ दाभाडे, माजी सदस्य, जिल्हा परिषद, पुणे.