प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 16 -खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील 24 तासात जोरदार पाऊस झाला. आधीच धरणे भरल्याने त्यात जोरदार पाऊस यामुळे चारही धरणांमध्ये पाण्याचा येवा वाढला. यामुळे धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी खडकवासला धरणात जमा होते. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवून दुपारी एक वाजता 30 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. यंदाच्या हंगामातील हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत होती.
पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने धरणातून विसर्ग वाढविण्यास शुक्रवारी सकाळपासून सुरुवात झाली. पानशेत धरणातून सकाळी सुमारे 1500 क्युसेकने विसर्ग सुरु होता. दुपारी यामध्ये वाढ करून 12 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत होत. वरसगाव धरणातून सकाळी सुमारे 1400 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. टेमघर धरणातून सकाळी 911 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. यामध्ये वाढ करून 1 हजार 469 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. या तीन धरणांतून सोडण्यात येणारे पाणी खडकवासला धरणात जमा होते. तीनही धरणांतून विसर्ग सुरू असल्याने खडकवासला धरणात 20 हजार क्युसेकने पाणी जमा होत आहे. यामुळे धरणातून विसर्ग वाढवून तो 30 हजार 677 क्युसेक करण्यात आला.
बंडगार्डनमधून 38 हजार क्युसेकने विसर्ग
मुळा व मुठा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मुठा व मुठा संगम पुलावर एकत्र येतात. त्यामुळे बंडगार्डन बंधाऱ्यावरून 38 हजार 608 क्युसेकने पाणी वाहत होते. रात्री उशीरपर्यंत बंडगार्डन बंधाऱ्यावरून 50 हजार क्युसेकने पाणी वाहण्याची शक्यता आहे.