नवी दिल्ली – सामान्य माणसांचा उदरनिर्वाह वाचवण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची असताना केंद्रात सत्तेत असलेला पक्ष करोना नियंत्रणाची प्राथमिकता सोडून राज्यातील सरकार पाडण्यासाठी मुख्य भूमिका पार पाडत आहे, असा थेट आरोप करत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे.
राजस्थानातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. विधानसभा अध्यक्षांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर अशोक गेहलोत यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहिले आहे. त्यामुळे जयपूरमध्ये सुरू असलेले राजस्थानातील सत्ता नाट्य आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचले आहे.
राजस्थानमध्ये लोकशाही पद्धतीनं सत्तेवर आलेल्या सरकार घोडेबाजाराच्या माध्यमातून पाडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या मुद्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छित आहे. आपल्याकडे बहुपक्षीय पद्धती असल्याने केंद्र व राज्यात वेगळ्या पक्षांची सरकारं निवडून येतात. हेच आपल्या लोकशाहीचं वैशिष्टय आहे. करोना महामारीच्या काळात लोकांचे जीव वाचवणे हीच आमची प्राथमिकता आहे, पण अशात राजस्थान निवडून आलेलं सरकार पाडण्यात प्रयत्न केले जात आहे.
सरकार पाडण्याच्या या कृत्यात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भाजपाचे इतर नेते आणि आमच्या पक्षातील काही अतिमहत्वकांक्षी नेतेही सहभागी आहेत. अशाप्रकारे लोकशाही मार्गाने निवडणून आलेली सरकार पाडण लोकशाही विरोधात आहे. असे षडयंत्र सर्वसामान्य माणसासोबत विश्वासघात आहे, असेही गेहलोत यांनी पत्रात नमूद केले आहे.