वडूज – खटाव तालुक्यातील मायणी येथे बुधवारी आमदार जयकुमार गोरे व हिम्मत देशमुख यांच्यात वादावादी झाल्यानंतर तणावाचे वातावरण झाले होते.
दोन्ही गटांचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाल्याने मायणीसह परिसरात भितीचे वातावरण तयार झाले होते. मात्र, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दोन्ही गटातील प्रमुख कार्यकर्त्यांना समजावून सांगितल्याने तणाव निवळला अन् मायणीकरांची सुटकेचा निश्वास सोडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मायणी येथील छ. शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे वैद्यकीय महाविद्यालय हे डाॅ. एम. आर. देशमुख यांनी काही वर्षापूर्वी स्थापन केले होते. त्यानंतर त्या महाविद्यालयाची भागीदारी आमदार जयकुमार गोरे यांनी घेतली होती. त्यातीलच किरकोळ वादातून आ. गोरे व मायणी येथील अजिंक्य को.आॅप. सोसायटीचे चेअरमन हिम्मत देशमुख यांच्यात वादावादी झाली.
त्यानंतर दोन्ही बाजूंनी बैठका सुरू झाल्या व दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मायणीत गोळा झाल्याने तणावाची परिस्थिती झाली होती. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख व त्यांच्या टिमने समझोता घालण्याचे काम केले होते. मात्र, सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव महामुनी हे मायणीत दाखल झाले. त्याचवेळी खटावचे माजी आमदार डाॅ. दिलीप येळगावकर घटनास्थळी दाखल झाले. यावेळी येळगावकर व महामुनी यांच्यात खडाजंगी झाली.
येळगावकरांनी महामुनी यांना खडे बोल सुनावत नि:पक्षपाती काम करण्याचा सल्ला दिल्याने महामुनी यांचा स्वाभिमान दुखावला. त्यामुळे दुखावलेल्या महामुनी यांनी परिस्थिती हातळण्याऐवजी थेट मायणी पोलीस चौकी गाठल्याने जमाव आणखी संतापला होता.
दरम्यान घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना मायणीला जाण्याच्या सुचना केल्या. पाटील यांनी मायणीत दाखल होताच दोन्ही बाजूच्या लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर मायणी पोलीस चौकीत बैठक घेत विषयावर पडदा पाडल्याने पुढील अनर्थ टळला.
पाटील – देशमुखांचे बेस्ट पोलिसिंग
मायणी हे गाव जिल्ह्यातील संवेदनशील गाव असल्याची शासन दप्तरी नोंद आहे. त्यामुळे आज घडलेल्या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख यांनी लोकांशी साधलेला संवाद व राबवलेल्या बेस्ट पोलिसिंगने मायणीतला तणाव निवळला.