Congress। लवकरच होणार्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी आपापल्या आघाड्यांबरोबर जागा वाटपाबाबत चर्चा सुरू केली. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाला लागलेली गळती कमी होताना दिसत नाही.
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे तीन वेळा बुलढाण्याच्या खामगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले दिलीप सानंदा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मुंबईत अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे, दिलीप सानंदा हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जात होते. मात्र विलासराव देशमुख यांचे निधन झाल्यापासून पक्षात त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचे बोलले जात आहे.
दिलीप सानंदा याच्याबाबत सांगायचे झाल्यास…
– दिलीप सानंदा यांनी १९९९ साली खामगाव विधानसभेची निवडणूक लढवली. तेव्हापासून सलग २००९ पर्यंत काँग्रेसचे आमदार राहिले आहेत.
-राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून गेली होती. त्यावेळी दिलीप सानंदा यांनी सक्रिय सहभाग नोंदवला नसल्याचा ठपकाही काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर ठेवला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पक्षात सष्क्रिय नसलेले दिलीप सानंदा हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.