K. Chandrashekar Rao – कॉंग्रेसला तेलंगणात विधानसभेच्या एकूण 119 पैकी 20 पेक्षाही कमी जागा मिळतील. मोठ्या बहुमताच्या आधारे भारत राष्ट्र समिती (बीआरएस) सत्ता राखेल, असा दावा त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी मंगळवारी केला.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएस आणि कॉंग्रेसमध्ये मुख्य लढत होणार असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर, एका प्रचारसभेत बोलताना केसीआर यांनी प्रामुख्याने कॉंग्रेसला लक्ष्य केले. तेलंगणात कॉंग्रेस विजयी होणार नाही याची गॅरंटी मी देतो.
मागील वेळेपेक्षाही अधिक जागा जिंकून बीआरएस पुन्हा सरकार स्थापन करेल, असे ते म्हणाले. तेलंगणाची स्थापना होण्याआधी अविभाजित आंध्रप्रदेशात कॉंग्रेसची सत्ता होती. मात्र, तो पक्ष पिण्यासाठी, शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करू शकला नाही.
त्याउलट, बीआरएस सत्तेवर आल्यानंतर तेलंगणाने वेगाने प्रगती केली. सध्या दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तेलंगणा देशात सर्वोच्च स्थानी आहे, अशी भूमिका केसीआर यांनी मांडली. तेलंगणात विधानसभा निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.