कोलकता – तृणमूल कॉंग्रेसचे खासदार असणारे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल यांनी नेतृत्व क्षमता सिद्ध केल्याचे प्रशस्तीपत्र त्यांनी दिले.
राहुल यांचा करिष्मा काम करू लागल्याचे दिसत आहे. त्यांच्या यात्रेला जनतेचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभत आहे. राहुल यांच्या यात्रेमुळे पुढील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे संख्याबळ दुप्पट होण्याचा विश्वास मला वाटतो. तसे घडावे अशी माझी इच्छा आहे, असे सिन्हा पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले. भाजप नेत्यांनी रथ यात्रा काढल्या. पण, राहुल पायी चालत असल्याने त्यांची खऱ्याअर्थी यात्रा सुरू आहे.
जनतेने त्यांना नेता म्हणून स्वीकारले आहे. पप्पू असा उल्लेख करून राहुल यांना गांभीर्याने न घेणारे चुकीचे ठरले आहेत, असे भाष्य त्यांनी केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख पुढील लोकसभा निवडणुकीत गेम-चेंजर ठरतील, असे भाकीतही सिन्हा यांनी केले. कॉंग्रेस आणि तृणमूलमधील संबंध सुधारण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली.
केजरीवाल यांची मागणी म्हणजे मास्टरस्ट्रोक –
गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीविषयीही सिन्हा यांनी भाष्य केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये किंग किंवा किंगमेकर ठरतील. त्यांनी चलनी नोटांवर भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची छायाचित्रे छापण्याची मागणी केली. ती मागणी म्हणजे मास्टरस्ट्रोक आहे. भाजप प्रत्येक वेळी हिंदुत्व आणि राम मंदिर मुद्द्यांचा लाभ उठवू शकत नाही. केजरीवाल यांनी भाजपला जशास तसे उत्तर दिले आहे, असे त्यांनी म्हटले.