नवी दिल्ली – राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी जारी करण्यात आली असून, उमेदवारी अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र कॉंग्रेसमध्ये उमेदवारांबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. परंतु अनेक नावांबाबतही अटकळ बांधली जात आहे. एकीकडे कपिल सिब्बल यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असताना कॉंग्रेसने अद्याप आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसच्या उमेदवारांबाबत शनिवारपर्यंत निर्णय होऊ शकतो. आतापर्यंत माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्या नावावर औपचारिक निर्णय घेण्यात आला असून, त्यांना राज्यातून राज्यसभेवर पाठवण्याच्या निर्णयाची माहिती कर्नाटक कॉंग्रेसला देण्यात आली आहे. मात्र उर्वरित नावांवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकतात.
कॉंग्रेसचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, पक्षाचे सरचिटणीस अजय माकन, सरचिटणीस आणि मीडिया प्रभारी रणदीप सुरजेवाला, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राजस्थानचे माजी खासदार भंवर जितेंद्र सिंह, माजी खासदार बद्री राम जाखड, कुलदीप बिश्नोई, अजित कुमार, सुबोध कांत सहाय यांच्यासारख्या नेत्यांना राज्यसभेचे उमेदवार बनवू शकतात.
दरम्यान, महाराष्ट्रातूनही कॉंग्रेसने उमेदवार निश्चित केलेला नाही. महाराष्ट्रातून मुकुल वासनिक, अविनाश पांडे, गुलाम नबी आझाद, मिलिंद देवरा यापैकी कुणालाही उमेदवारी दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे या सर्व नावांमध्ये संजय निरुपम यांनी मंगळवारी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली.