नवी दिल्ली – कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या राजस्थानमध्ये या वर्षीच्या अखेरीस निवडणूक होणार आहे. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात अद्यापही दिलजमाई झालेली नाही. त्या नेत्यांना मानणाऱ्या गटांमधील सुप्त संघर्षामुळे प्रदेश कॉंग्रेसमध्ये गृहकलह कायम असल्याचे चित्र आहे. अशात निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे काँग्रेसने निवडणुकांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतल्याचे समजते.
राजस्थानमधील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. बैठकीला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, पायलट आणि राजस्थानमधील अनेक नेते उपस्थित होते. प्रकृती ठीक नसल्याने गेहलोत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.
राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणूक चेहरा पुढे न करता लढवण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. त्यामुळे त्या राज्यातील गृहकलह टाळण्यासाठी कॉंग्रेसने तोडगा काढल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील निवडणुकीला एकोप्याने सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ताबदल होत असल्याचा ट्रेंड आहे. एकजुटीने लढल्यास तो ट्रेंड बदलून पुन्हा सत्तेवर येऊ शकतो, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. पक्षशिस्त मोडणारे जाहीर भाष्य टाळावे, असा इशारा कॉंग्रेस श्रेष्ठींनी राजस्थानमधील नेत्यांना दिल्याचे समजते.