नवी दिल्ली – निधीच्या टंचाईमुळे सरकारने 126 राफेल विमानांऐवजी केवळ 36 विमानेच घेण्याचा निर्णय घेतला होता अशी कबुली केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत दिली आहे. त्यावरून कॉंग्रेसने आज पुन्हा एकदा राफेल विषयावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी आज या संबंधात सांगितले की मोदी सरकारने कमी विमाने खरेदी करून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी तडजोड केली असून त्यांच्या या कृतीचे सत्य आज गडकरींच्या विधानांवरून बाहेर आले आहे.
केवळ पैशाचे कारण देऊन 126 ऐवजी 36 विमानेच घेणे म्हणजे देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात घालण्यासारखेच असून मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षेविषयी तडजोड केली आहे. सरकारने 126 ऐवजी 36 राफेल विमानेच का खरेदी केली हा प्रश्न सरकारला सातत्याने विचारला गेला. त्याला सरकारने प्रत्येकवेळी वेगवेगळी उत्तरे दिली. पण गडकरी यांनी एका मुलाखतीत निधीची टंचाई हे यातले प्रमुख कारण असल्याचे नमूद केले होते.