सात प्रांताधिकारी; 14 तहसीलदारांची नियुक्ती
नगर: दुष्काळी भागात पाणी व पशुधनासाठी चारा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून 500 चारा छावण्या व 774 टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. चारा छावण्यांमध्ये जनावरांना नियमित चारा मिळतो का व टॅंकर सुरु असलेल्या गावांत ठरवून दिलेल्या खेपा होत आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदारांची पथके तयार करूण अचानक तपासणी केली. याबाबत संबंधित अधिकारीही अनभिज्ञ होते. त्यांनाही शेवटच्या क्षणी कुठल्या भागाची तपासणी करायची, याची माहिती मिळाली. त्याचा अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना सादर होणार असून, कोणावर कारवाई होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दुष्काळी भागात पाणी व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 500 चारा छावण्या सुरु आहेत. 774 टॅंकर सुरू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गावातील टॅंकर जीपीएस, लॉगबुक, जनावरांच्या छावण्या अचानक तपासणीसाठी जिल्हाधिकारी यांनी 21 पथकांची नियुक्ती केली होती. त्यामध्ये 7 प्रांताधिकारी व 14 तहसीलदारांचा समावेश होता. त्यानुसार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा अथवा चारा छावण्यांमध्ये अनियमितता आढळल्यास त्याचा चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याबाबत आदेश देण्यात आले.
यामध्ये सकाळच्या सत्रात प्रत्येक प्रांताधिकारी व तहसीलदारांनी एक गावातील चारा छावणीची तपासणी करण्याचे सांगण्यात आले. दुपारच्या सत्रात एक एक गावातील चारा छावण्यांची उलट तपासणी करण्यातत आली. यामध्ये जिल्ह्यातील 21 पथकांनी 42 गावांमधील चारा छावण्या व टॅंकर यांची तपासणी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.
टॅंकर व चारा छावण्यांबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्याने व पालकमंत्र्यांनी सोमवारी घेतलेल्या टंचाई आढावा बैठकीत अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी चारा छावण्या व टॅंकरबाबत अचानक 21 पथकांची नियुक्ती करून तपासणी करण्याचे आदेश दिले असल्याचे बोलले जात आहे.
टॅंकरची चौकशी करून अहवाल सादर करण्या बाबत …
ज्या गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो, त्या गावामध्ये विहीर, बोअरवेला अधिग्रहण शक्य आहे किंवा नाही. गावांच्या 1.5 किलोमीटर परिसरात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे की नाही, गावात पाणीपुरवठा योजना आहे किंवा नाही, असे असल्यास या स्त्रोतांची सद्यस्थिती काय आहे, टॅंकर जवळच्या उद्भवावरून भरले जातात की नाही, याची खात्री करणे, गावाची लोकसंख्या त्यानुसार उपलब्ध पाणी यानुसार टॅंकरद्वारे मागील केलेल्या खेपा योग्य आहेत की नाही,
मजूर टॅंकर व मंजूर खेपा प्रमाणे दररोज पाणीपुरवठा होतो किंवा नाही. तसेच याबाबत पाणीपुरवठा समितीचे नियंत्रण आहे काय. तसेच महिला समितीच्या दोन किंवा तीन सदस्यांच्या सह्या आहेत का, टॅंकर तपासणीत जीपीएस कार्यंन्वित आहे काय, त्याचा अहवाल रोजच्या रोज घेतला जातो का? शासन निर्णयानुसार अवैध पाणी उपशांच्या कितीप्रकरणात कार्यवाई करण्यात आली आहे, याबाबत अहवाल सादर करण्यात आला आहे.
छावणीच्या अहवाल सादर करण्याबाबत
- छावणीमध्ये पशुधनाला दिले जाणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणी केली जाते का?
- छावणीमध्ये दाखल जनावरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नियमित पणे तपासणी केली जाते का? आवश्यक ते औषधोपचार केले जाते का.
- जनावरांचे लसीकरण झाले आहे की नाही.
- नकाशा प्रमाणे छावणीची रचना केली आहे काय?
- आजारी जनावरांसाठी स्वंतत्र व्यवस्था करण्यात आली आहे का?
- छावणी मालकाने स्वतंत्र विद्युत मीटर घेतले आहे का?
- प्रत्येक जनावराची व चारा वाटप ठिकानांचे व्हिडिओ चित्रीकरण होण्यासाठी सी.सी.टीव्ही कॅंमेरे बसविण्यात आले आहे का?
- छावणी परिसरात धूम्रपान होत असल्याचे आढळून आले आहे का
- तसेच जनावरांना पशुखाद्य दिले जाते का?
- शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणे चारा वाटप केली जाते का?
जनावरांना दिला जातो कमी चारा
शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे मोठ्या जनावरांना 18 किलो व लहान जनावरांना 9 किलो चारा देणे बंधनकार आहे. किंवा वाळलेला चारा 5 ते 6 किलो किंवा मुरघास मोठ्या जनावरांना 8 किलो तर लहान जनावरांना 4 किलो देणे बंधन कारक आहे. परंतु अनेक छावण्यामध्ये मोठ्या जनावरांना 15 किलो, तर लहान जनावरांना 7.5 किलो चारा वाटप करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे.