नवी दिल्ली – कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एका ट्वीटमध्ये हिंदीमधील काही खास म्हणींचा वापर करुन राहुल गांधी यांनी केंद्र सरकार कशाप्रकारे तपास यंत्रणा आणि देशातील जनतेला वेठीस धरत आहे, याचा गंभीर आरोप केला आहे.
राहुल गांधी यांनी आयकर विभाग, सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय तपास यंत्रणा याबाबत उंगलियों पर नचाना या म्हणीचा वापर करत केंद्र सरकार या तिन विभागांना आपल्या बोटांवर नाचवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केंद्र सरकारकडून केला जात असल्याचा आरोप यापूर्वीही अनेकदा झाला आहे. कॉंग्रेसच्या काळातही असे आरोप अनेकदा झाले होते.
राहुल गांधी यांनी माध्यमांबाबतही एक म्हण लिहिली आहे. माध्यमे पंतप्रधान मोदी यांचे मित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदींसमोर माध्यमे भीगी बिल्ली बनतात असा गंभीर आरोप केला आहे. त्याचबरोबर खिसियानी बिल्ली खंबा नोचे या म्हणीचा वापर करुन सरकार आपला राग शेतकरी नेते आणि त्यांच्या समर्थकांवर छापे टाकून काढत असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.