नवी दिल्ली – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आणीबाणीचा निर्णय ही चूकच होती, असे कॉंग्रेसचे सध्याचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यावरुन आता भाजपमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ते माफी मागता मागता थकतील पण त्यांच्या चुकांची गणती संपणार नाही, असा टोला भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी लगावला आहे.
आणीबाणीत ज्या लोकांचे प्राण गेले, ज्या प्रकारे त्यांनी लोकशाहीची हत्या केली. ते माफीच्या लायक आहे का? चुकांच्या प्रत्येक वळणावर त्यांच्या गुन्ह्यांचा ढिग दिसेल, असा घणाघात नक्वी यांनी केला. मंगळवारी अमेरिकेतील कॉर्नेल विश्वविद्यापीठातील पाध्यापक आणि भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी आणीबाणीच्या मुद्द्यावर भाष्य करताना ती एक चूक होती, असे स्पष्टपणे म्हटले आहे.
मात्र, कॉंग्रेसने पक्ष म्हणून त्याचा कधीही फायदा करुन घेतला नाही. तेव्हा जे झाले आणि आज जे होत आहे, त्यात मोठा फरक आहे, असे ते म्हणाले होते व सध्या देशाच्या यंत्रणाच ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला होता.