मुंबई – केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकार सत्तेत आल्यापासून देशातील एकेकाळचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला गळती लागली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस सोडून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली. मात्र आता सत्तेत काँग्रेस पक्ष आला आहे. तर भाजप राज्यात विरोधात आहे. तरी देखील काँग्रेसच्या एका बड्या नेत्यांन भाजप प्रवेशाचा निर्णय़ घेतला आहे.
माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महापालिकेतील समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून आर्टिकल 370 व 35A हटविल्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर कृपाशंकर सिंह यांनी सवाल केले होते. काँग्रेसच्या या भूमिकेच्या निषेधार्थ त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर त्यांनी भाजप नेत्यांशी घरोबा निर्माण केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणेशोत्सवात सिंह यांच्या घरी गेले होते. त्याचवेळी कृपाशंकर सिंह भाजपमध्ये जाणार असल्याचे कयास वर्तवण्यात येत आले होते. आता यावर शिक्कामोर्बत होणार आहे.