मुंबई : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसांत समाप्त झालं. वादळी ठरेलल्या या अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नाही. मागील चार महिन्यांपासून रिक्त असलेली निवडणूक पावसाळी अधिवेशनात होईल, अशी शक्यता होती. मात्र तसं झाल नाही.
काँग्रेसनेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झालं. मागील अधिवेशन देखील विधानसभा अध्यक्षांविनाच पार पडलं होतं. पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल असा अंदाज होता. मात्र आता ती शक्यता संपली आहे.
दरम्यान हिवाळी अधिवेशनापूर्वीच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं समजतं. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दखील विधानसभा अध्यक्षपद भरण्यात यावे, असं पत्र ठाकरे सरकारला पाठवले होते. पण, राज्यपाल भाजपची मागणी लावून धरत दबाव आणत आहे. त्यामुळे राज्यपालांचा हा निर्णय डावलण्यात यावा, असा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत झाला होता.