नवी दिल्ली : देशात जगभरातील नेत्यांची जी २० शिखर परिषदेसाठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. त्यात अनेक देशांसोबत भारताचे अनेक मुद्द्यांवर करार होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. परंतु,काँग्रेसच्या अध्यक्षांना यासाठीचे निमंत्रण देण्यात आले नसल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
भारताची राजधानी दिल्ली येथे आज जी-२० परिषदेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आमंत्रित केले गेले नाही. याविषयी बोलताना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना,”राज्यकर्त्याचं मन छोटं असेल तर असं होतं. तुम्ही देवेगौडा, मनमोहन सिंग यांना बोलवलं. ते प्रकृतीमुळे येऊ शकत नाही. मात्र देशाच्या विरोधी पक्षाचे नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहे. तुम्ही त्यांना बोलवत नाहीत. यावरून तुमच्या मनात भीती असल्याचं स्पष्ट होतं. तुम्ही देशात जे कांड करून ठेवता, त्याची पोलखोल होईल, विरोधीपक्षनेते करत असतात. राज्यकर्त्यांचं मन मोठं असावं लागतं. तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांचा द्वेष करत आहात हे चुकीचं असल्याचे राऊत यांनी म्हटले.
दरम्यान मोदींनी एक पुस्तक छापलं असून त्यात ‘इंडिया’ नाही, भारत असं म्हटलं. त्यात भारताला मदर ऑफ डेमोक्रेसी आहे. हे पुस्तक सर्वांना दिलं. मात्र तुमची मदर ऑफ डेमोक्रेसी देशासाठी अडचणीची झाली आहे. संसदेत विरोधकांच्या नेत्याला स्थान नाही. मग ही कसली लोकशाही. देशात एवढी मोठी परिषद होत आहे. त्यात तुम्ही सर्वांना बोलवायला पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले.
या देशात सर्व राष्ट्रांचे प्रमुख आलेले आहेत. ज्यांनी आपली जमीन घेतली, ती परत मिळणार आहे का? भारतावरील कर्ज माफ होणार आहे का? किती खर्च झाला आहे? तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा बैठका महत्त्वाच्या असतात, मोदींनी ते केलेलं आहे. इंदिरा गांधी, नेहरू असताना देखील अशा प्रकारच्या बैठका झाल्याचे राऊत यांनी म्हटले. दरम्यान पुतिन येथे आलेले नाहीत, हे लक्षात घ्या. शेवटी काय मिळणार आहे? आमचं लक्ष आहे, लडाखमध्ये शेजारी देशाने घेतलेल्या जमिनी परत मिळणार असतील तर आम्ही बैठकीच स्वागत करू. या बैठकीमुळे जर भारताची ताकद वाढलेली असेल तर त्याचंही स्वागत करू असे राऊत यांनी नमूद केले.