मुंबई – राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जालन्यात मनोज जरांगे हे या आरक्षणासाठी गेल्या 12 दिवसांपासून उपोषण करत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून ओबीसींमधून आरक्षण द्यावे या मागणीवर ते ठाम आहेत. पण आता त्यांच्या या मागणीला स्वतः कुणबी समाज आणि ओबीसी समाजाकडून विरोध सुरु झाला आहे. त्यातच आता यावर ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला आवाहन केलं आहे
पंकजा मुंडे म्हणाल्या,’राज्य सरकार मराठा आरक्षण देऊ शकते. मराठा आरक्षणावर राज्य सरकार तोडगा काढू शकते. कोणाला किती आरक्षण द्यायचे? कुणाला आरक्षणात कसे बसवायचे? याचा आराखडा सरकारकडे असतो, त्यांनी विश्वासाने आणि हिंमतीने आंदोलकांशी चर्चा करुन आरक्षण द्यायला पाहिजे, मराठा समाजाला आता शब्द नको आहे, दिशाभूल नको आहे. त्यांना ठोस आरक्षण हवे आहे. ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद लावू नका. कोणताही विरोध नाही, दोघात भांडणे लावून तिसरी माणसे गंमत पाहतील हे महाराष्ट्राला नको आहे, असं माध्यमांशी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या आहे.
यापूर्वीही मराठा आरक्षणासाठी जे तरुण आत्महत्या करताहेत त्यांच्याबाबत मला खूपच वाईट वाटत आहे. मी मराठा समाजाच्या सर्व तरुणांना हात जोडून विनंती करते की, तुमची जी मागणी आहे ती करा, पण त्यासाठी स्वतःचा जीव वैगरे द्यायाचा विचार करु नका. छत्रपती शिवरायांचे आपण वंशज आहोत त्यांच्या विचारांनी लढण्याच्या भूमिकेनं लढा. स्वतःचा जीव देण्यासारखं लेकरांनी काम करु नये, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली होती.