नवी दिल्ली – हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षच भारतीय जनता पार्टीसमोर आव्हान निर्माण करू शकतो. आम आदमी पक्षात ती पात्रता नाही अशी टिप्पणी कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. आप हा केवळ दिल्लीपुरता मर्यादीत पक्ष आहे असेही ते म्हणाले.
श्रीनगर येथे पत्रकारांशी बोलताना आझाद म्हणाले की मी जरी कॉंग्रेसमधून बाहेर पडलो असलो तरी त्या पक्षाच्या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाला माझा विरोध नाही. पक्षाची यंत्रणा दुबळी झाल्यामुळे मी बाहेर गेलो. अजुनही माझी इच्छा आहे की गुजरात आणि हिमाचल प्रदेशात कॉंग्रेसची कामगिरी चांगली व्हावी. आप त्यासाठी सक्षम नाही. कॉंग्रेसने आपल्या प्रदीर्घ वाटचालीत हिंदू, मुस्लिम, शेतकरी सगळ्यांनाच बरोबर घेतले आहे. गुजरात आणि हिमाचलमध्ये आप काहीच करू शकत नाही. पंजाबमध्येही तो पक्ष अपयशी ठरला असून त्या राज्यातील जनता त्यांना पुन्हा मतदान करणार नाही.
पंजाब राज्य ते कार्यक्षमतेने चालवू शकले नाहीत. त्यामुळे भाजपला ते नाही तर केवळ कॉंग्रेसच आव्हान देऊ शकते.
दरम्यान, जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले होते. त्यावर आझाद म्हणाले की आपण अनेक वेळा हा मुद्दा उपस्थित केला आहे. जर सरकार असा विचार करत असेल तर त्याचे स्वागतच आहे. कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यावर गुलाम नबी आझाद यांनी स्वत:चा डेमोक्रॅटीक आझाद पार्टी नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे.