पाटणा –देशात प्रदीर्घ काळ सत्तेवर असूनही कॉंग्रेसने काहीच न केल्याचा आरोप केला जातो. पण, देशात लोकशाहीचे जतन कॉंग्रेसनेच केले. त्यामुळेच सर्वसामान्य कुटूंबातून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या पदापर्यंत पोहचू शकले, अशी भूमिका कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरूवारी मांडली.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला विविध राज्यांत चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या यात्रेपासून प्रेरणा घेत कॉंग्रेसच्या बिहार शाखेने राज्यव्यापी यात्रा सुरू केली. बांकामध्ये त्या यात्रेच्या प्रारंभावेळी खर्गे बोलत होते. कॉंग्रेसने लोकशाहीचे संगोपन केल्यानेच माझ्यासारखा गरीब व्यक्तीचा मुलगा आज त्या पक्षाचे नेतृत्व करत आहे, असे ते म्हणाले.
खर्गे यांनी भाजपच्या राष्ट्रवादावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसने इंग्रजांविरोधात लढून देशाच्या स्वातंत्र्यात योगदान दिले. त्याउलट, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाजपचे कुठलेही योगदान नव्हते, असे त्यांनी म्हटले. देशातील तरूणांना रोजगार पुरवण्यात मोदी सरकारला सपशेल अपयश आले आहे. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी भावना भडकावणारे मुद्दे उपस्थित करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.