मुंबई – महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या कथित वादामुळे आज मुंबई काँग्रेसची बैठक रद्द करण्यात आली आहे. यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांच्या अनुपस्थितीचे कारण देण्यात आले आहे. मविआच्या जागावाटपात मुंबईतील 6 पैकी केवळ 2 काँग्रेसच्या वाट्याला आल्यात. त्यात दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्याला गेली आहे.
यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आळवला जात आहे. या प्रकरणी बुधवारी दुपारी मुंबई काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. पण वर्षा गायकवाड (Congress leader Varsha Gaikwad) यांच्या गैरहजेरीमुळे ती ऐनवेळी रद्द करण्यात आली. आता ही बैठक उद्या गुरुवारी होणार असल्याची माहिती आहे.
वर्षा गायकवाड काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज –
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या निर्णयामुळे नाराज असल्याची चर्चा आहे. याच बाबतीत मुंबई काँग्रेसची बैठक आज बोलण्यात आली होती. यामध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा होणार होती. मात्र, या बैठकीला वर्षा गायकवाड उपस्थित राहिल्या नाहीत. वर्षा गायकवाड या काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच दुसरीकडे काँग्रेसमधील नेते नाराजी व्यक्त करत आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघातून विश्वजीत कदम यांनी थेट माध्यमांसमोर येत नाराज व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे वर्षा गायकवाड यांनी सर्वांशी संपर्क तोडला आहे.
मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड या इच्छुक –
मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड या इच्छुक होत्या. ही जागा काँग्रेस पक्षाला सुटावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटतात ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडण्यात आली. त्यामुळे वर्षा गायकवाड यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीला देखील वर्षा गायकवाड उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींची माफी मागावी लागली. वर्षा गायकवाड यांना अचानक महत्त्वाचे काम आल्यामुळे त्या बैठकीला आल्या नसल्याचे कारण या वेळी पुढे करण्यात आले आहे.