तिरुअनंतपुरम – भारत ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी संकल्पना सातत्याने मांडत आहे आणि जी 20 अध्यक्षपदाच्या काळात भारताची ही थीम आहे. तथापि भारत जगापुढे आपली विश्वासार्हता गमावत आहे, कारण भारतातील मणिपूर नावाचे राज्य जळत आहे आणि त्या प्रकरणात भारत सरकार पुरेशा गांभीर्याने कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. असा दावा, कॉंग्रेस नेते खासदार शशी थरूर यांनी केला आहे.
ते म्हणाले की भारताचे पंतप्रधान त्यांच्या भाषणात ‘वसुधैव कुटुंबकम’संकल्पनेबद्दल बोलत असतात, पण त्याच वेळी “आपले एक राज्य जळत असताना त्यांच्या या दाव्यावर कोण विश्वासार्हता दाखवेल. जगभरातील लोक जे भारताबद्दल वाचत असतील ते म्हणतील की भारतातच प्रथम मानवता आणि सौहार्द आवश्यक आहे. म्हणून, मी मोदीजींना विनंती करेन की किमान आमची जागतिक विश्वासार्हता वाचवण्यासाठी तरी मणिपुरबाबत काहीतरी पाऊले उचलावीत.
दिल्लीस्थित पत्रकार जॉर्ज कल्लीवायलील यांनी लिहिलेल्या ‘मणिपूर एफआयआर’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. केरळ मीडिया अकादमीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सीपीआय(एम) नेते आणि राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास हे देखील उपस्थित होते.
थरूर यांनी आपल्या भाषणात, मणिपूरमधील हिंसाचाराचे “स्लो बर्निंग हॉरर” म्हणून वर्णन केले आहे. ते म्हणाले की, मे महिन्यात मणिपुरात हिंसाचार सुरू झाला तेव्हा तेथे तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सूचना आपण केली होती. “तथापि, आजपर्यंत, ते केले गेले नाही. केंद्राने ठरवले आहे की जर तेथे भाजपची सत्ता कायम ठेवायची असेल तर तोच मुख्यमंत्री कायम ठेवावा लागेल, त्यामुळे त्यांना तेथे राष्ट्रपती राजवट नको आहे, असे थरूर म्हणाले,