नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते रविशंकर प्रसाद यांनी त्यांना तेवढ्याच जोरात प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांना युनिकॉर्न समजते का येथपासून केवळ दोनच जण कॉंग्रेस पक्ष चालवत आहेत, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, कॉंग्रेस पक्षात अनेक चांगले लोक आहेत. मात्र त्या पक्षात लोकशाही आहे का? केवळ सोनिया गांधी आणि राहुल गांधीच पक्ष चालवत आहेत. जनता जर तुम्हाला मतदान करत नसेल तर त्याचे खापर तुम्ही लोकशाहीवर का फोडत आहात?कॉंग्रेसची लोकशाही म्हणजे भ्रष्टाचारशाही होती. मोदी सरकारचे आगमन झाल्यामुळे दलालांची सद्दी संपली आहे. त्यांच्यासाठी दारे बंद झाली आहेत. आज संरक्षण विषयक कोणत्याही सौद्यात कमिशनबाजी होत नाही. त्यामुळे कॉंग्रेस आणि त्यांचे भ्रष्टाचार तंत्र नाखुष आहे. राहुल यांच्या बोलण्यातून त्यांची हीच व्यथा दिसून येते आहे.
रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले, राहुल गांधी म्हणतात ते खोटे बोलत नाहीत. मग त्यांनी हेही सांगावे की ते जामीनावर का आहेत. नॅशनल हेराल्ड काही कारणांमुळे चालू शकले नाही. 80 कोटींपेक्षा जास्त कर्ज होते. 2010 मध्ये असोसिएटेड जनरलने त्याचे सगळे शेअर्स यंग इंडियाला दिलेत. याच यंग इंडियात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रत्येकी 38 टक्के भागिदारी होती. त्यांनी नॅशनल हेराल्डला केवळ 50 लाख रूपये दिले आणि 80 कोटींचे कर्ज माफ केले. नॅशनल हेराल्डची जवळपास 5 हजार कोटीची प्रॉपर्टी ट्रस्टच्या नावाखाली या कुटुंबाच्या नियंत्रणात आणली गेली.
“डिसेंबरपर्यंत लागू होऊ शकतो सीएए कायदा”; भाजप आमदाराचा दावा
रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल यांनी स्टार्टअपची खिल्ली उडवली याचे वाईट वाटले. राहुल गांधी यांना खरी माहिती मिळते का, त्यांना युनिकॉर्नचा अर्थ माहिती आहे का, भारताची स्टार्टअप यंत्रणा आज जगात तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर आहे हे तरी त्यांना माहिती आहे का?भारतात आज 100 युनिकॉर्न आहेत याची त्यांना कल्पना आहे का?.
“भाजपकडून गांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न”; नाना पटोले यांचे टीकास्त्र