कोटा – मर्चंट नेव्हीतील भारताचे दहा खलाशी उत्तर सायप्रस मधील जहाजावर गेल्या काही दिवसांपासून अडकून पडले असून त्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत असे आवाहन राजस्थानातील एका कॉंग्रेस नेत्याने केले आहे. कॉंग्रेस नेते चरमरेश शर्मा यांनी सांगितले की या खलाशांच्या नातेवाईकांनी आपल्याला ही माहिती दिली असून त्या प्रकरणात केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
या जहाजाच्या मालकाने हे जहाज दुसऱ्या एका कंपनीला विकले आहे. आणि नवीन मालकाने हे जहाज लिबीयाला नेऊन पोचवण्याची सुचना त्या जहाजावरील तेरा खलाशांना केली आहे. या खलाशांना जहाजाच्या बाहेर येण्यास मनाई करण्यात आली आहे. हे जहाज उत्तर सायप्रसमधील समुद्रात नांगरून ठेवण्यात आले आहे.
यातील संजयसिंह राठोड नावाच्या भारतीय खलाशाने आपल्या पत्नीशी व्हॉटसऍप वरून संपर्क साधला असून त्याने म्हटले आहे की जहाजावरील अन्न आणि पाणीही संपत आले असून आमचे आयुष्य धोक्यात आले आहे. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने लक्ष घालून प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.