– अमित डोंगरे
भारतीय संघ इंग्लंडमध्ये अक्षरशः हवालदील झाल्याचे दिसून येत आहे. संघ बदल करताना टीका झाली. मात्र, शार्दुल ठाकूर व उमेश यादव यांनी संधीचे सोने केले, हे नाकारता येणार नाही, पण मग पहिले पाच फलंदाज काय करतात, याचाही विचार व्हावा. भारतीय क्रिकेटपटूंची इतकी निराशाजनक मानसिकता यापूर्वी कधी दिसली नाही. टोकियोत ऑलिम्पिक पाठोपाठ सध्या पॅरालिम्पिक स्पर्धा सुरू आहे. त्यात दिव्यांग खेळाडू स्वप्नवत कामगिरी करत आहेत. आता विराट कोहली आणि कंपनीने या खेळाडूंकडून जरी प्रेरणा घेतली तरी भारतीय संघाच्या कामगिरीत सुधारणा घडेल.
पाच कसोटी सामन्यांच्या या संपूर्ण मालिकेत भारताकडून लोकेश राहुलचे एकमेव शतक नोंदले गेले. मात्र, एकदा पुजाराने, दोन वेळा कर्णधार कोहलीने तर एकदा अजिंक्य रहाणेने अर्धशतकी पल्ला गाठला. बाकी सगळा आनंदीआनंदच होता. रोहित शर्मा खरेतर अफाट गुणवत्ता असलेला खेळाडू, पण त्यालाही धावांसाठी झगडताना पाहावे लागत आहे. राहुलनेही पहिल्या सामन्यानंतर चमक दाखवली नाही. पुजारा, रहाणे, कोहली, ऋषभ पंत यांच्या बॅटमधून पूर्वी धबधब्यासारख्या धावा निघात होत्या. आता हा धबधबाच आटला आहे.
नॉटिंगहॅम कसोटी अनिर्णित राहिली. त्यानंतरच्या लॉर्ड्स कसोटीत भारताने, तर हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडने विजय मिळवला. यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता लीड्सवर सुरू असलेला सामना जिंकत मालिकेत सुरक्षित आघाडी घेण्याची दोन्ही संघांना संधी आहे.
भारतीय संघाने पहिल्या डावात जी फलंदाजी केली ती पाहता ही मालिका आपण राखू असे वाटत नाही. कोहली व ठाकूर यांची अर्धशतके वगळल्यास हेडिंग्लेसारखीच अवस्था झाली असती. फलंदाजांना नक्की काय झाले आहे हेच समजेनासे झाले आहे. लीड्स कसोटीत भारताचा पहिला डाव दोनशे धावांच्या आत रोखताना इंग्लंडने अर्धी बाजी तरी मारली आहेच, पण त्यांच्या डावालाही घसरण लागली होती. त्यांचे पहिले पाच फलंदाज स्वस्तात बाद झाले. मात्र, नेहमीप्रमाणे अखेरच्या किंवा ज्यांना तळातील फलंदज म्हणतात त्यांनी भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले. हे काही पहिल्यांदा घडलेले नाही. कित्येक सामन्यात भारतीय गोलंदाज पहिले पाच-सहा फलंदाज बाद केल्यावर शेपूट वळवळते व तेच महागात पडते.
आपल्याला देशाच्या संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. जवळपास 130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात ही संधी अगदी मोजक्या खेळाडूंनाच मिळते. मग टोकियोत आपले दिव्यांग खेळाडू पॅरालिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत असताना इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट संघ ढेपाळताना पाहावत नाही. निदान या पॅरा खेळाडूंकडून तरी प्रेरणा घ्या…