नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या महत्वाकांक्षी भारत जोडो यात्रेचा समारोप 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये होणार आहे. त्या समारोपावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करत कॉंग्रेसने 21 समविचारी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. आता ते पक्ष कॉंग्रेसला कसा प्रतिसाद देणार याविषयीची उत्सुकता वाढणार आहे.
कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संबंधित पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण देणारे पत्र पाठवले आहे. त्या पक्षांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट, तृणमूल कॉंग्रेस, जेडीयू, नॅशनल कॉन्फरन्स, सप, बसप, द्रमुक, भाकप, माकप, झामुमो, राजद, तेलगू देसम, रालोसप, पीडीपी, एचएएम, एमडीएमके, व्हीसीके, आययुएमएल, केएसम आणि आरएसपीचा समावेश आहे. खर्गे यांनी पत्रातून निमंत्रण पाठवण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. सत्य, सलोखा, अहिंसेचा संदेश देशभरात पोहचवण्यासाठी यात्रा काढण्यात आली.
यात्रेच्या समारोपावेळी समविचारी पक्षांचे नेते उपस्थित राहिल्यास त्या संदेशाला आणखी बळकटी मिळेल, असे त्यांनी म्हटले. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपशी ताकदीने दोन हात करण्यासाठी एकत्र येण्याचा सूर विरोधकांकडून आळवला जात आहे. प्रस्तावित एकजुटीसाठी कॉंग्रेस अनुकूल असल्याचे खर्गे यांनी दिलेल्या निमंत्रणावरून पुन्हा सूचित झाले आहे.