Rajasthan – गरीब लोकांना आणखी गरीब केल्याबद्दल आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही प्रयत्न केले तरी राजस्थानात पुन्हा कॉंग्रेस पक्षाचेच सरकार येईल असा विश्वास कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला. भरतपूर येथे झालेल्या प्रचारसभेत त्यांनी थेट मोदी यांनाच आव्हान दिले.
भाजप गरीबांना अधिक गरीब आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्याचेच काम करते. त्यांनी कायमच त्यांच्या मित्रांचा लाभ करून दिला. मात्र कॉंग्रेस पक्ष गरीब, शेतकरी आणि युवा वर्गासाठी काम करतो. आम्ही गरीबांसाठी काही बोललो की पंतप्रधान म्हणतात की हे रेवडी आणि पैसे वाटण्याचे काम करतात.
राजस्थानातील आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी संपूर्ण तिजोरी गरीबांसाठी खाली केली आहे. तथापि, त्याचा काय लाभ होणार असा प्रश्नही ते विचारतात. मात्र मी त्यांना सांगतो की आम्ही गरीबांनाच तर दिले आहे. तुम्ही श्रीमंतांचे 15 लाख कोटी रूपयांचे कर्ज माफ केले.
आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी तुमच्याकडे केली होती. मात्र तुम्ही तसे केले नाही. युवकांची दिशाभूल करत त्यांनी अग्निवीर योजना आणली. जर केंद्रात आमचे सरकार आले तर आम्ही यातून निश्चितच कोणतातरी मार्ग काढू असे खर्गे यांनी सांगितले.
आपल्या देशाची घटना सामाजिक न्यायाच्या गोष्टी करते. दलितांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. नेहरू आणि अन्य नेत्यांनी अनेक कायदे केले. जर आम्ही स्वभावत: दलित विरोधी राहीले असतो तर असे केले नसते.
ते मात्र दलित विरोधी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा भारतीय जनता पार्टीला पुढे न्यायचा आहे. त्यांनी स्वत: दलितांसाठी, गरीबांसाठी काही केलेले नाही आणि आता दुसऱ्यांकडे बोट दाखवत आहेत अशी टीकाही खर्गे यांनी केली.