मुंबई – राज्यातील सर्वपक्षीय 12 आमदार लवकरच लंडनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या 12 आमदारांचा हा पाच दिवसांचा अभ्यास दौरा असणार आहे. या दौऱ्यात ते ब्रिटनमधील सुशासन आणि सार्वजनिक धोरणांचा अभ्यास करणार आहेत. एकमेकांवर दररोज तोंडसुख घेणारे हे आमदार लवकरच ब्रिटनमध्ये एकत्र फिरताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना हे आमदार लंडनवारी करणार आहेत.
लंडन दौऱ्यावर जाणाऱ्या आमदारांमध्ये भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), कॉंग्रेस, समाजवादी पार्टी या पक्षाबरोबरच अपक्षांचा समावेश आहे. हे आमदार लंडनमध्ये जाऊन सुशासनाचा अभ्यास करणार आहेत. दौऱ्यातील चांगल्या गोष्टींचा आपल्याकडील धोरणांमध्ये समाविष्ट करण्याची सूचना हे शिष्टमंडळ करत असते. त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात करायची, हे सरकारवर अवलंबून असते.
या आमदारांमध्ये भाजपचे अमित साटम, मिहिर कोटेचा, जयकुमार रावल, मंगेश चव्हाण, पंकज भोयर, तर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कॉंग्रेसचे अमीन पटेल, झिशान सिद्दिकी, अमित झनक, अस्लम शेख, तर समाजवादी पार्टीचे रईस शेख, अपक्ष सत्यजित तांबे यांचा समावेश आहे.
येत्या दि. 20 ते 25 नोव्हेंबरदरम्यान या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. ब्रिटनमधील वर्ल्ड स्क्रीनिटी सेट डेव्हिड या विद्यापीठांमध्ये सुशासन आणि सार्वजनिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी आमदारांचा हा लंडन अभ्यास दौरा असणार आहे.
दरम्यान, राज्यात काही जिल्हे दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड देत आहेत. राज्याची आर्थिक स्थिती तेवढीसी चांगली नाही. शेतकऱ्यांना जाहीर केलेले गेल्या वर्षीचे कांदा अनुदानातील काही रक्कम सरकारकडून अजूनही मिळालेली नाही. या वर्षीचा खरीप हंगामही बेताचाच झालेला आहे. अनेक विभाग आतापासूनच पाणीटंचाईला तोंड देत आहेत. त्यामुळे राज्य टंचाईच्या सीमारेषेवर उभे असताना अशी सरकारी उधळपट्टी कितपत योग्य, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.