गुवाहाटी – ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे अध्यक्ष आणि आसामच्या धुबरी मतदारसंघाचे लोकसभा खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांसाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.
अजमल म्हणाले की, काँग्रेसमुळेच राज्यातील अनेक लोकांवर बांगलादेशी असे लेबल लावले जात आहे. पक्षाच्या बैठकीत ते म्हणाले, आम्ही बांगलादेशी नाही. काँग्रेसनेच आमच्या कपाळावर बांगलादेशी टॅग लावला आहे. काँग्रेसने येथे अटक छावणी बांधली. त्यांनी एनआरसीची समस्या निर्माण केली.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी सांगितले की, राष्ट्रीय नागरिक नोंदणीमध्ये फसवणूक केलेल्या लोकांची नावे काढून टाकण्याची तयारी सरकार करत आहे. यासाठी आम्ही तज्ज्ञांशी बोलणी सुरू केली असल्याचे सरमा यांनी सांगितले.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी हे विधान अशावेळी केले आहे जेव्हा एनआरसी यादीत फसवणूक करून मोठ्या प्रमाणात लोकांची नावे नोंदवली गेली असल्याचा आरोप होत आहे. आसामचे मुख्यमंत्री रविवारी गुवाहाटीतील पश्चिम बोरागाव येथे शहीद दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आसाममध्ये १० डिसेंबर हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.