मुबंई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दारुची दुकाने उघडली तर मंदीर बंद का? अशी विचारणी केली आहे. राज्यपालांच्या या विचारांशी मा. राष्ट्रपती सहमत आहेत का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. त्यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. या पत्रव्यवहारावरुन आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढे म्हटले आहे की, राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही. कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का? असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला आहे.