नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आजचे भाषण सगळ्यांत लहान भाषण तर होतेच, मात्र त्यांनी आज कोणतीही मोठी घोषणा केली नाही हाही एक चर्चेचा विषय ठरला. सामान्यत: लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर किंवा काही आठवड्यांवर आल्या असताना लोकप्रिय घोषणा करण्याची संधी सरकारकडून साधली जाते. मात्र आज तसे काही करण्यात आले नाही. याउलट आपणच तिसऱ्यांदा सत्तेवर येणार असा आत्मविश्वास सरकारला वाटतो आहे असे सूचित करणारी काही विधाने आणि मुद्दे आजच्या भाषणात दिसली.
जुलै महिन्यात पुन्हा एकदा नव्या सरकारकडून पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल व त्यावेळी आपणच सरकारमध्ये असणार आहोत असे काही संकेत सीतारामन यांनी दिले. एवढेच नव्हे तर पुन्हा मोदी सरकारच येणार असल्याचे त्यांनी थेटपणे आपल्या भाषणात सांगितलेही. आपल्या भाषणात कोविडचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की देशातील जनता आमच्या चांगल्या कामगिरीच्या आधारावर आम्हाला पुन्हा एकदा जनादेश देणार आहे.
कोविडसारख्या मोठ्या आव्हानांचा आमच्या सरकारने यशस्वी सामना केला असून आत्मनिर्भर भारताची पायाभरणी केली आहे असे सांगतानाच त्यांनी यावेळी एक भविष्यवाणीही केली. चेहऱ्यावर थोडे हास्य आणत त्या म्हणाल्या की जुलै महिन्यात जेंव्हा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल त्यावेळी त्यांनी नेमके काय म्हणायचे होते हे सभागृहात उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच लक्षात आले. जुलै महिन्यात आमचे सरकार विकसित भारताचा रोड मॅपच सादर करेल असे त्यांनी जाहीर केले.
सीतारामन यांनी वारंवार विकसित भारताचा उल्लेख केला. २०४७ पर्यंत आपल्याला हे करायचे असल्याचा संकल्पही केला. हे सगळे सांगत असताना ते विद्यमान सरकारच्या अनुशंगानेच बोलत होत्या. पुढील पाच वर्षे ही सबका साथ या संकल्पासह अभूतपूर्व विकासाची असतील असेही त्यांनी सांगून टाकले.