औंध – म्हाळुंगे माण हायटेक सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाविरोधात म्हाळुंगे ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे ग्रामपंचायतीच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे. हा रस्ता करताना जागा हस्तांतरणासंदर्भात म्हाळुंगे येथील शेतकऱ्यांना विचारात घेतले जात नसल्याने ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच काम सुरू केले जात असून प्रशासकीय अधिकारांचा वापर करून कामे रेटण्यात येत असल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे. संबंधित शेतकरी व पीएमआरडीएचे आयुक्त यांच्यातील बैठक व चर्चेनुसार शेतकऱ्यांच्या जागांचे मोजमाप केल्यानंतर त्यांना पाणीपुरवठा, ड्रेनेज व इतर आवश्यक सुविधा देण्याचे ठरले होते; परंतु प्रत्यक्षात कोणत्याही शेतकऱ्याला जागेचे मोजमाप करून ताबा दिलेला नाही. तसेच, 36 मीटर रस्त्याचे चालू असलेले कामही शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच सुरू आहे. यास सर्वांचा विरोध असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नगर नियोजन (टीपी) योजनेतील अंतिम भूखंड व सातबारा उतारा वाटप केल्यानंतर या योजनेतून दिल्या जाणाऱ्या पाणी, ड्रेनेज व इतर नागरी सुविधा देणे गरजेचे असताना आम्हाला या सुविधा दिलेल्या नाहीत. तसेच, आमची मागणी ऐकून न घेताच कामे केली जात असून हा आमच्यावरील अन्याय असून याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, अशी मागणी म्हाळुंगे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
रस्त्याच्या कामाला आमचा विरोध नाही. परंतु, अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आमच्या जागांचा मोबदला दिला जावा व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन या रस्त्याचे काम करावे. प्रशासनाकडून अधिकाराचा गैरवापर करून हे काम रेटून नेण्यात येत आहे. त्यास आमचा तीव्र विरोध आहे. आमची मागणी मान्य न करता काम केल्यास बाधित शेतकऱ्यांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– कालिदास शेडगे, शेतकरी