पुणे (विजयकुमार कुलकर्णी) – ग्राहक आयोगात तक्रारदारच गैरहजर राहण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. असे खटले ग्राहक आयोगाकडून निकाली काढण्यात येत आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग येथे एप्रिलपासून आतापर्यंत अनुक्रमे 20 आणि 15 खटले निकाली काढण्यात आले आहेत. त्यापैकी दोन्ही आयोगांतील प्रत्येकी 11 खटले हे तक्रारदार गैरहजर राहिल्याने निकाली काढण्यात आलेले आहेत. या खटल्यांचा विचार केल्यास 50 टक्क्यांहून अधिक प्रमाण तक्रारदार गैरहजर असण्याचे आहे.
विविध प्रकरणांत फसवणूक झालेल्या ग्राहकांना मोबदला, व्याज ग्राहक मंचात मिळवून दिले जाते. मानसिक, शारीरिक त्रास, तक्रार अर्जाचा खर्चही ग्राहक आयोग ग्राहकाला मिळवून देत असतो. ग्राहकांनी आयोगात दाद मागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याबरोबरच दाखल केलेल्या तक्रारदारांनीच दाव्यात गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन-तीन वर्षे झाले तरी तक्रारदार हजरच राहात नाहीत.
यामुळे तक्रारदार राहतात गैरहजर
खटला दाखल केल्यानंतर काही कालावधीनंतर पुरेसा पुरवा नसल्याचे तक्रारदारांच्या लक्षात येते. त्यामुळे ते गैरहजर राहतात. तर तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदार आणि ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या जाब देणाऱ्यांमध्ये आणि तक्रारदारांमध्ये समझोता होतो. मात्र, याबाबतची माहिती पक्षकारांकडून मंचात देण्यात येत नाही. त्यामुळे तक्रारदार, जाबदेणार दोघेही गैरहजर राहतात. तर काही प्रकरणांमध्ये कौटुंबिक कारणांमुळे तक्रारदार हजर राहू शकत नाहीत. सुनावणीसाठी लागणाऱ्या कालावधीमुळे तक्रारदार हजर राहण्याचे टाळतात. तर विषयाची आर्थिक किंमत आणि त्यासाठी लागणाऱ्या वेळेचा विचार करून काही तक्रारदार हजर राहण्याचे टाळतात.
ग्राहक आयोगात दावा केल्यानंतर तक्रारदार गैरहजर राहतात. अशा प्रकरणांमध्ये ग्राहक आयोग सुनावणीसाठी पुढील तारीख देतात. मात्र, बराच कालावधी तक्रारदार हजर न राहिल्यास असे दावे ग्राहक कडून निकाली काढण्यात येतात. अशा प्रकारे निकाली काढण्यात येणाऱ्या दाव्याचे प्रमाण मोठे आहे.
ऍड. महेंद्र दलालकर, अध्यक्ष, ग्राहक सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य.