नारायणगाव -निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. आज भेटी दिलेल्या 8 ते 10 गावांमध्ये सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जबाबदारीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पाठपुरावा करुन सर्व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याची ग्वाही शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
खासदार आढळराव पाटील यांनी जुन्नर तालुक्यात वादळाने बाधित झालेल्या शेतीची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, अंकुश आमले, उपसभापती दिलीप डुंबरे, जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, उपतालुकाप्रमुख धनंजय डुंबरे, मंगेश काकडे, प्रकाश शेटे, बबनराव कुलवडे, विश्वास आमले, विकास राऊत उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील येणेरे, निरगुडे, बेलसर, पिंपळगाव सिध्दनाथ, ओतूर, उदापूर, डिंगोरे, जुन्नर शहरासह आदी गावांना भेटी दिल्या. बहुतेक सर्व गावांत एकही शेतकरी वादळातून वाचला नाही. यावेळी आढळराव पाटील यांनी अनेक उदाहरणे समोर मांडून शेतकऱ्यांच्या पिकांची भीषणता समोर आणली.
ते म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खचून न जाता खंबीरपणे उभे रहावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपत्तीबाबत चर्चा झाली आहे. त्यांनी कृषी मंत्रालयास सूचना दिल्या आहेत. कृषीमंत्री भुसे यांना माहिती दिली आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनास पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे होऊन तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याची ग्वाही, त्यांनी दिली.