प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या भूसंपादनापोटी मोबदला देण्याचे काम सुरू झाले आहे. भूसंपादनाचे पहिले ऍवार्ड मावळ तालुक्यातील उर्से गावातील शेतकऱ्यांना देण्यात आले. सुमारे अडीच एकर क्षेत्रासाठी संबंधित शेतकऱ्याला 5 कोटी 65 लाख 92 हजार रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.
रिंगरोडसाठी स्वखुशीने जागा देणाऱ्यांना पाच पट मोबदला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार उर्से येथील शेतकऱ्यांनी स्वखुशीने जागा दिल्यामुळे त्यांच्या जमिनींचे ऍवार्ड यापूर्वी जाहीर करण्यात आले. त्यास शासनाने मान्यता दिली. पुणे-पिंपरी-चिंचवड व जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण प्रकल्प असलेल्या रिंगरोडच्या भूसंपादनाच्या मोबदल्यापोटी जमिनीच्या मालकांना पहिला धनादेश शनिवारी देण्यात आला, अशी माहिती मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दिली.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम “एमएसआरडीसी’ने हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व व पश्चिम असे दोन टप्पे आहेत. पूर्व रिंगरोड उर्से (ता. मावळ)- केळवडे (ता.भोर) असा आहे. तर, पश्चिम रिंगरोडला केळवडे (ता. भोर) पासून सुरुवात होणार असून, हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे. रिंगरोड हा 37 गावांमधून जाणार आहे. त्यासाठी सुमारे 695 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. यातील 36 गावांतील जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.
रिंगरोडच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून पुरवणी अंदाजपत्रकात दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 250 कोटी रूपयांचा निधी भूसंपादनासाठी वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार निधी उपलब्ध झाल्याने आता खऱ्या अर्थाने रिंगरोडच्या भूसंपादनाला सुरुवात झाली आहे.