खडकवासला : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही घेरा सिंहगड परिसरात स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांची आजही फरफट होत आहे. परिणामी रस्त्यालगतच अंत्यसंस्कार करण्याची वेळ या परिसरातील नागरिकांवर आली आहे. परंतु अद्यापही या दुर्गम भागाकडे संबंधित प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
ऐतिहासिक किल्ले सिंहगडाच्या पायथ्याशी आतकरवाडीमध्ये रविवारी डोकं सुन्न करणारं हे भयावह चित्र पहायला मिळाले. रविवारी (दि. 11) येथील एका ज्येष्ठ नागरिकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्थानिक नागरिकांना स्मशानभूमी नसल्याने रस्त्यावर वाहणारे पावसाचे पाणी ओसरण्यासाठी तब्बल तीन तास मृतदेह घेऊन ताटकळत थांबावे लागले. पाऊस विश्रांती घेत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी भर पावसातच तात्पुरता पत्र्याचा आसरा उभारून स्थानिक आदिवासी ज्येष्ठ नागरिकावर अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडावे लागले.
रविवारी दुपारपासून सिंहगड खोऱ्यात जोरदार पाऊस पडत होता.
स्मशानभूमीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने ग्रामस्थ पाऊस थांबण्याची वाट पाहत थांबले होते. तब्बल तीन तास अंत्यविधी लांबला मात्र पाऊस काही थांबत नव्हता. अखेर ग्रामस्थांनी भर पावसातच आसरा म्हणून लाकडी खांब उभे करून त्यावर पत्रे टाकुन अंत्यविधी करण्याचा निर्णय घेत मुसळधार पावसातच अंत्यविधी पार पाडले. पुणे शहराच्या अगदी जवळ असलेल्या गावातले हे वास्तव आहे. घेरा सिंहगडमध्ये आठ ते दहा लहान मोठी गावे असून बहुतांश गावात अद्यापही स्मशानभूमीची सोय नाही. येथील ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी हक्काची जागाच नसल्याने येथे राज्य सरकार व जिल्हा परिषदेमार्फत स्मशानभूमी उभारल्या गेल्या नाहीत. त्यामुळे येथे अनेक ठिकाणी रस्त्यातच अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले जातात.
घेरा सिंहगड ग्रामपंचायतीमार्फत आतकरवाडी, सांबरेवाडी, थोपटेवाडी, भडाळेवाडी, दुर्गदरा व इतर ठिकाणी स्मशानभूमीसाठी राज्य सरकारमार्फत वन विभागाची जागा मिळावी म्हणून वेळोवेळी मागणी केली जात आहे. मात्र वन विभागाच्या जाचक अटीमुळे जागा मागणीचे प्रस्ताव लालफितीतच अडकून पडले आहेत. माजी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी जागा मागणीचे आपले गाऱ्हाणे पोहचवले आहे. जिल्हा प्रशासनाने ऐतिहासिक किल्ले सिंहगडाचे ऐतिहासिक महत्त्व विचारात घेऊन घेरा सिंहगडमधील सर्वच गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी येथील नागरिकांमधून होत आहे.
घेरा सिंहगडमधील रहिवाशांची परवड थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वनविभागाशी चर्चा करण्याची गरज आहे. घेरा सिंहगडमधील सर्व गावांत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. येथील चारही महसुली गावांसाठी गावठाण जाहीर करण्याचे प्रस्ताव मागील सात वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडे धूळखात पडून आहेत.
– दत्ता जोरकर, माजी सदस्य पंचायत समिती हवेली
घेरा सिंहगड ग्रामपंचायत वारंवार स्मशानभूमीसाठी जागेची मागणी करीत आहे. येथील आतकरवाडी, सांबरेवाडी, थोपटेवाडी, दुर्गदरा, भडाळेवाडी व इतर गावांत वर्षांतून पाच ते सातवेळा अशीच दुर्देवी परिस्थिती निर्माण होते. सरकारने तातडीने आमच्या जागेची अडचण दूर करावी.
– मोनिका पढेर, सरपंच, घेरा सिंहगड