सातारा – सातारा जिल्हा हा शूरवीरांचा, क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सैनिकांचा हा जिल्हा आहे. निसर्ग संपन्नतेने आणि वैविध्यतेने नटलेल्या या सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध आहे. विकासप्रक्रिया गतीमान करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्यासह सर्व जिल्हावासीयांनी साथ द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्री. देसाई बोलत होते. ध्वजवंदनानंतर श्री. देसाई यांनी पोलीस दलाची मानवंदना स्विकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेखर, अतिरीक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देऊन श्री. देसाई म्हणाले, आपल्या जिल्ह्याचे स्व. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांना लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांनी मोलाची साथ दिली.
त्यांनी व आत्तापर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांमुळे राज्यातच नव्हे तर देशात सातारा जिल्ह्याचा नावलौकीक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर केलेल्या जिल्ह्याचा विकास आराखड्यात कृषि, पर्यटनसह इतर विकासकामांचा समावेश आहे. पर्यटन आराखड्यानुसार कोयनेचा भाग, कांदाटी खोऱ्यातील असे एकूण 85 किलोमीटर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यातून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. हा आराखडा तात्काळ पर्यटन व सांस्कृतीक विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री महादेयांनी दिल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 400 आदर्श शाळा करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 50 शाळांची निवड करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेलाही चांगल्या आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रें निर्माण करण्यात येणार आहेत. खाजगी हॉस्पीटलच्या धर्तीवरच अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र तयार होणार आहेत. डोंगर दऱ्यातील वाड्या-वस्त्या मुख्य रस्त्यांनी जोडण्यासाठी डोंगरी विकास आराखडा सादर केला आहे.
नागरिकांना विविध योजनांच्या लाभासाठी शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागू नये, शासकीय योजनांचा सहज लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी शासन आपल्या दारी ही योजना सुरु केली आहे. आत्तापर्यंत या योजनेंतर्गत साडेचार लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याला अग्रेसर ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार प्रयत्न करीत आहेत. तसेच महाराष्ट्रातील जवळ सर्व साखर कारखान्यांना मिळून 10 हजार कोटींचा आयकर भरावा लागला असता तो केंद्र शासनाने माफत करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे याबद्दल त्यांनी केंद्र शासनाचे विशेष आभार मानले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
आर्चरी या खेळातील एकाच हंगामात अदिती स्वामी हिने दोन आंतरराष्ट्रीय विश्वविजेतेपद प्राप्त केले. राज्यस्तरीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. शहीद जवान सुरज शेळके यांची वीरमाता सुवर्णा व वीरपिता प्रताप, शहीद जवान सोमनाथ तांगडे यांच्या विरपत्नी रेश्मा यांना पालकमंत्री देसाईंनी ताम्रपटांचे वितरण केले.