मुंबई : राज्यात काल 288 जागांसाठी मतदान पार पडले. आता उमेदवारांसह सर्वांनाच निकालाची धाकधुक असल्याचे पहायला मिळत आहे. परंतू, त्यातच मतमोजणी केंद्रावर जॅमर लावण्याची मागणी विरोधकांनी केली होती. विरोधकांच्या या मागणीला निवडूक आयोगाकडून नकार देण्यात आला आहे.
मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवणार नाही, अशी स्पष्ट भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे. यापूर्वी स्टॉंगरूम आणि मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. आता त्यावर हे जॅमर बसवणार नसल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष करण्यात आले आहे.
ईव्हिएम मशीन या फुलप्रुफ आहेत. तसेच या मशीन्सना बाह्य यंत्रणांद्वारे हाताळता येऊ शकत नाही. त्यामुळे मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंगरूममध्ये मोबाईल जॅमर बसवण्याच्या प्रश्नच उद्भवत नसल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी स्पष्ट केले. आम्ही व्हिव्हिपॅट आणि ईव्हिएम मशीन्सबाबत सर्व ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबवले आहेत. तसेच त्यांचा इंटरनेटशी, वायफायशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जॅमर लावण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही, असे सिंग यांनी स्पष्ट केले.
ईव्हिएम आणि व्हिव्हिपॅटमशीन हॅक होण्याचा धोका असल्याने मतदानाच्या दिवसापासून मतमोजणीपर्यंत राज्यातील सर्व मतदान केंद्रे आणि स्ट्रॉंगरुमच्या किमी परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत जॅमर बसवण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे.