तालुक्यातील वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न कधी सुटणार?
पुणे – हवेली तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याशी संबंधित प्रश्न सध्या अडगळीत पडल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील 23 गावे महानगर पालिकेत समाविष्ठ झाल्यापासून तालुक्यातील सत्ताधारी व विरोधक प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याने हवेलीकर पोरके झाल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे. त्यामुळे आगामी काळात हवेली तालुक्यातील सर्वसामान्यांचे वर्षानुवर्षे अडगळीतील प्रश्न कधी सुटणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
येथे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या अनेक समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रयत्न करण्यात आले होते. या समस्या काही प्रमाणात सोडण्यासाठी ग्रामपंचायती यशस्वी झाल्या आहेत. मात्र तरीही भौगोलिक विस्तार निधी तसेच शासकीय परवानग्या आदी कारणांमुळे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करूनदेखील काही समस्या वाघोलीकरांच्या मनात घर करून बसल्या आहेत.पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत गाव समाविष्ट झाल्यानंतर या समस्या सोडविण्यात येतील अशी आशा स्थानिक नागरिकांना होती. यामध्ये पिण्याचे पाणी सांडपाणी व्यवस्थापन तसेच कचऱ्याची समस्यांचा समावेश आहे. परंतु येथील समस्या वर्षानुवर्षे भिजत पडल्या आहेत.
पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सातत्याने सुरू असलेली अपघात मालिका अद्यापही सुरूच आहे. तसेच वाहतुकीच्या प्रश्नांसहीत महामार्ग सुरक्षिततेवर तोडगा म्हणून हडपसर नं. 15 ते उरुळी कांचन पर्यंत दोन मजली इलिव्हेटेड उड्डाणपूल तसेच त्यावर भविष्यात तरतूद म्हणून मेट्रो पुलाची बांधणीसाठी वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार करुन मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली काही दिवसांपूर्वी दिली होती. परंतु पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट ते कासुर्डी दरम्यान महामार्गाच्या दुरवस्थेविषयी सातत्याने होणारे अपघात व स्थानिक दुरवस्थेचा मुद्दा अद्यापही जैसे थे आहे.
आगामी काळात लोणी काळभोर परिसरात मेट्रो मार्ग होणार आहे. त्यामुळे या भागाला मोठे महत्व प्राप्त होणार आहे. परंतु पूर्व हवेलीतील समस्या अद्यापही कायम आहेत. त्यामुळे हवेली तालुक्यातील समस्यांना कोण वाली आहे की नाही, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. तसेच उरुळी कांचन, वाघोली परिसरातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या लगत कचरा पडलेला दिसून येत आहे. वाघोली गाव महानगरपालिकामध्ये समाविष्ट झाल्यानंतरही मुख्य समस्या पाणी, कचरा, ड्रेनेज तसेच या भागासाठी भामा-आसखेडचे पाणी आणण्यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा सुरू आहे. याबाबत प्रतिनिधींकडून आश्वासनांच्या फैरी मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे. परंतु या कायम चर्चेतील प्रश्न कधी सुटणार याकडे हवेली तालुक्यातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत.
लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांची बोळवण
हवेली तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्यातील सत्ताधारी व विरोधक लक्ष देण्यात स्वारस्य दाखवत नसल्याने तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींची मनधरणी करण्याची वेळ येत आहे. परंतु लोकप्रतिनिधींकडून मात्र आश्वासनांची बोळवण करण्यात येत आहे. झपाट्याने नागरीकरण होत असलेला हवेली तालुका विविध समस्यांनी वेढला आहे. तालुक्यात रहिवासी प्रश्नांसह सहकार क्षेत्र, रेल्वे व बस वाहतूक सुविधा, अपूर्ण रस्ते, वीज, पोलीस प्रशासन सुसूत्रता, मिळकतींवर आरक्षणे आदी प्रश्न कायम आहेत.
राहुल गणगे