उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग
गावकी-भावकीचे राजकारण रंगणार
राहुल गणगे
पुणे : राज्यातील सरपंचाची निवड आता पुन्हा एकदा थेट जनतेतून होणार आहे. महाविकास आघाडीनंतर शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करून आता सरपंचपदाची निवड थेट जनतेतून करण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यातच आता दुसऱ्या टप्प्यातील पुणे जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. त्यामुळे भावी लोकनियुक्त गाव कारभाऱ्यांनी गावकी – भावकीचे मत जुळवणीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज असलेले निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवार नागरिकांसह गाव नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरूवात केली आहे.
सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय हा यापूर्वीच घेण्यात आलेला होता. परंतु महाविकास आघाडी सरकारने ह्या निर्णयास स्थगिती देऊन सरपंचाची निवड ही सदस्यांमार्फत करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले आहे, त्यांनी सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय पुन्हा घेतला आहे. त्यानुसार सरपंचपदाची निवडणूक थेट पद्धतीने अवलंबण्यात येणार आहे.
ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणूकीसाठी बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली असून गावकी – भावकीच्या राजकारणाला मात्र वेग येणार आहे.
निवडणुकीसाठी पूर्व हवेलीतील अनेक इच्छुकांनी विविध कार्यक्रम, वाढदिवस आदी उपक्रमांना हजेरी लावत प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या निर्णयामुळे निवडणूका वारंवार लांबत असल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला होता. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत असताना उमेदवार शोधण्यासाठी पॅनेल प्रमुखांचा जीव कासावीस होण्याची शक्यता आहे.
कागदपत्रांसाठी लगबग…
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पॅनेल प्रमुख उमेदवारी देताना बंडखोरी कशी रोखता येईल याबाबत रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे कधीही ग्रामपंचायतीत न फिरकणाऱ्यांनी उमेदवारीसाठी आपली ताकद पणाला लावली असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास 28 नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. 2 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज दाखल करण्यास चार दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे इच्छुकांची कागदपत्रे जुळवाजुळव करण्यास लगबग सुरू झाली आहे.