अफजलखान कबर परिसरातील विनापरवाना बांधकाम 22 तासांच्या मोहिमेद्वारे उध्वस्त
पाचगणी – किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजलखानाचा दर्गा व त्या परिसरातील विनापरवाना बांधकाम सलग 22 तासांच्या मोहिमेद्वारे उध्वस्त करण्यात आले. यासाठी 284 मजूर, 4 जेसीबी, 2 पोकलेन, 2 मोठ्या क्रेन, 9 ट्रॅक्टर व 3 ट्रक यांच्या मदतीने ही मोहीम सातारा जिल्हा प्रशासनाने फत्ते केली. आता त्या ठिकाणी केवळ अफजलखान व सय्यद बंडा यांच्या कबरी शिल्लक आहेत. सध्या त्या ठिकाणी प्रचंड पोलिस बंदोबस्त असून सर्वसामान्यांना त्या भागात प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे.
स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानास 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी ठार केले होते. अफजलखानाच्या मदतीला धावून आलेल्या सय्यद बंडालाही ठार केले. त्या दोघांना शिवाजी महाराजांनी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे दफन केले. शिवाय त्याठिकाणी कबर बांधून देखभालीसाठी मुजावराची नेमणूक केली होती. देखभालीसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद शिवाजी महाराजांनी त्याकाळी केली होती. दरम्यानच्या काळात या परिसराचे उदात्तीकरण सुरू झाले. हे उदात्तीकरणात 1967 पासून वाढत गेले.
कबरींभोवती बांधकाम उभे राहिले. त्याभोवती पुन्हा दुसरे बांधकाम उभे राहीले. वन खात्याच्या जागेत अतिक्रमण सुरू झाले. अनेक खोल्या व मोठा सभामंडप बांधला. दरवर्षी तेथे अफजलखानाचा उरूस भरू लागला.या उदात्तीकरणाविरोधात लढा सुरू झाला आणि न्यायालयाच्या आदेशाने सर्व विनापरवाना बांधकाम उध्वस्त करून आज त्या लढयाचा अंत झाला. गुरूवारी पहाटे चार वाजता अतिक्रमण काढण्यास सुरूवात झाली. या अतिक्रमण हटाव मोहिमेत पाच जिल्ह्यांतील पोलिस, वन व महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
कडाक्याच्या थंडीत किल्ले प्रतापगडास पोलिसांनी वेढा घातला होता. एकही रस्ता अथवा पायवाट पोलिस बंदोबस्तातून सुटली नाही आणि 22 तासांच्या अथक परिश्रमानंतर गनिमांनी उभे केलेले इमले उध्वस्त करून मोहीम फत्ते झाली.
जमावबंदी आणि परिसराची नाकेबंदी
सध्या किल्ले प्रतापगडावर जमावबंदी आदेश असून प्रतापगडाचे रहिवासी वगळता कोणालाही गडावर प्रवेश दिला जात नाही. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला प्रचंड पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर आता त्या ठिकाणी केवळ दोन कबरी दिसत आहेत. याठिकाणी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.